क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले
भारतातील पहिल्या महिला शाळेची पहिली महिला शिक्षिका, स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या, पददलितांच्या कैवारी आणि प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे स्थान अढळ आहे. एका अशिक्षित स्त्रीने स्वतः शिक्षण घेऊन शिक्षिका बनावे आणि वर्षानुवर्षे अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्यां स्त्री व शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखवावा ही गोष्ट भारताच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासात अपूर्व अशी आहे.
एकोणिसाव्या शतकात पेशवाईचा अस्त झाला आणि समाजप्रबोधनाची पहाट झाली. समाजप्रबोधनाची प्रक्रिया इतकी वेगवान होती, की प्रत्येक बदल हा क्रांतिकारक स्वरूपाचा होता. जे कधीही घडले नाही, जे कधीही पाहिले नाही अशा घटनांची मालिकाच सुरु झाली.प्रत्येक वाईट प्रथेवर समाजसुधारकांनी प्रहार करून, ती समूळ नष्ट करण्याचा वसाच घेतला होता. या क्रांतिकारक कार्यांनी संपूर्ण समाजजीवनच ढवळून निघाले. एका अन्यायी, अत्याचारी युगाचा अंत होऊन नवीन युगाचा प्रारंभ झाला. या नाव्युगाचे निर्माते आहेत महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले हे दाम्पत्य.
सावित्रीबाई फुले यांचे बालपण
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात शिरवळ गावाजवळील शंभरदीडशे घराची वस्ती असलेल्या नायगाव या एका छोट्याशा गावात खंडोजी नेवासे पाटील राहत होते. त्यांच्याकडे गावच्या पाटीलकीचा मान होता. हा भाग अवर्षणाचा, वर्षानुवर्षे दुष्काळाची परंपरा लाभलेल्या या गावात, शूद्र मागासवर्गीय म्हणून शिक्षणापासून वंचित असलेले हे कुटुंब होते. या गरीब शेतकरी कुटुंबात लक्ष्मीबाई खंडोजी पाटलाच्या घरी ०३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाईचा जन्म झाला. खंडोजी नेवासे पाटलांना नंतर तीन मुलं झाली. त्यामुळे सावित्री व तिचे सिद्जी, सखाराम आणि श्रीपती असे चौघेजण नेवासे कुटुंबात वाढत होते. सावित्री वडील बहीण असल्यामुळे आपल्या भावांना भरपूर प्रेमाने सांभाळून आईला मदत करीत होती.
त्याकाळी मागासवर्गीयांनी शिक्षण घेणे पाप होते. शूद्रांनी शिक्षण घेतले तर ब्राह्मणांचा वैदिक (हिंदू) धर्म बुडत होता. त्यामुळे सावित्रींना शिक्षण घेण्याचा प्रश्नच आला नाही. पूर्वी मुला-मुलींची लग्न बारा वर्षांच्या आतच बालवयात करण्याची प्रथा होती.सावित्री नऊ वर्षांची झाली आणि खंडोजी पाटलांना मुलीच्या लग्नाची काळजी लागली. आणि मुलाचा शोध घेऊ लागले. सावित्रीसाठी पुण्याचे स्थळ घर चालून आले. पुण्यात भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव फुले यांनी सुपुत्र जोतिबांसाठी खंडोजी नेवासे पाटलांकडे सावित्रीसाठी मागणी घातली. त्यावेळी जोतिबाचे वय तेरा वर्षांचे होते. जोतिबा- सावित्रीचा लग्नाचा योग जुळून आला. सन १८४० मध्ये सावित्रीचे जोतिबाबरोबर लग्नसोहळा पार पडला. सावित्री आता सासरी पुण्यात गोविंदराव फुले यांच्या घरी ९ व्या वर्षी नांदावयास आली.
सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण
वयाच्या नवव्या वर्षीच सासरी आलेल्या सावित्रीला शिक्षणाचा गंधही नव्हता. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने त्यांच्यासाठी शाळा नव्हती. त्यामुळे सावित्रीला शाळेचे कधी तोंडच पहाण्याचा योग आला नव्हता. इंग्रजांनी शाळा सुरू केल्यामुळे जोतीबांना तीन वर्गापर्यंत शिक्षण घेऊन ब्राह्मणांच्या दबावामुळे शाळा सोडले होते. परंतु गोविंदरावांचे मित्र आणि सगुणाबाई यांनी आग्रह केल्यामुळे जोतिबांना पुढचे शिक्षणासाठी स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत टाकण्यात आले. जोतीराव शिक्षण घेत होते, सोबतच वडिलांना शेतीतील कामात मदत करीत होते.
दुपारच्या वेळी आपण शाळेत काय शिकत आहोत, हे सावित्रीला जोतिराव वाचून दाखवत असत आणि समजावूनही सांगत असत. जोतिरावांना वाटे आपली पत्नी सावित्रीही शिकली पाहिजे; परंतु इंग्रजांनाही मुलींची शाळा काढण्यासाठी पुण्यात भरपूर प्रयत्न केले; पण पुण्यातील धर्ममार्तंड ब्राह्मणांनी मुलींच्या शाळा काढण्यास विरोध केला. त्यामुळे इंग्रजांनाही मुलीची शाळा काढणे शक्य झाले नाही. या कारणाने जोतिरावांची पंचाईत झाली. त्यांना सावित्रीला शिकवावयाचे होते.घरात तर पती-पत्नीला बोलायलाही मनाई होती. अशा परिस्थितीतही जोतिबांनी सावित्रीला शिकविण्याचा दृढनिश्चय केला आणि मार्ग काढला.घरी सावित्रीला शिकविता येत नव्हते. म्हणून जोतिबांनी शेताची निवड केली. दररोज शाळा संपली की, जोतिबा मळ्यात जाऊ लागले आणि सावित्रीबाईला व मावस बहीण सगुणाबाई यांना जमिनीची पाटी करून काडीचा पेन करून बाराखडी शिकवायला सुरुवात केली. झाडाची पाने तोडून एक, दोन मोजून उजळणी घेऊ लागले. जमिनीच्या पाटीवर शंभरापर्यंचे पाढे आणि संपूर्ण मराठी बाराखडी शिकविण्यात आली.शब्दरचना, गणित, वनस्पती, प्राणी ओळख इत्यादी विषयाचे ज्ञान संपादन केल्यावर सावित्रीबाईला शिक्षणाची जिज्ञासा वाढली. या पद्धतीने ती खूप शिकली, पुस्तक वाचू लागली. बेरीज-वजाबाकी समजू लागली. परंतु यामुळे सावित्रीचे शिक्षण कीती झाले हे कसे ठरविणार? त्यासाठी मळा नव्हे तर एखादी शाळा हवी होती.सगुणाबाई मि. जॉन नावाच्या मिशनऱ्यांच्या मुलांना सांभाळीत असत. त्यामुळे तिचा पुण्यातील इंग्रज महिलांशी संपर्क होता. मिसेस मिचेल यांनी पुण्यातील छबीलदास यांच्या वाड्यात एक नॉर्मल स्कूल चालविले होते. नॉर्मल स्कूल म्हणजे आजच्या अध्यापक विद्यालयासारखाच प्रकार होता. सगुणाबाईने जोतिबांना सांगून मिसेस मिचेलची भेट घेतली.सावित्री आणि सगुणाबाईंना नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश देण्याची विनंती केली. जोतिबा दुसरे दिवशी सावित्री आणि सगुणाबाईंना घेऊन नॉर्मल स्कूलमध्ये गेले. मिसेस मिचलने त्या दोघींची परीक्षा घेतली. त्या दोघीही त्यांच्या परिक्षेत पास झाल्या. त्या दोघीनाही तिसऱ्या वर्गात प्रवेश मिळाला. त्या दोघीनी जिद्दीने अभ्यास करून अध्यापिकेची पदवी संपादन केली.
सन १८४७ साली जोतिरावांनी सावित्रीचे अध्यापनाचे शिक्षण पूर्ण केले. जोतिराव आणि सावित्री एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी भारतातील समाज व्यवस्थेचा काळाकूट अंधार दूर सारून समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून मुक्त करण्याचा निर्धार केला. हे एक पाखंडी धर्ममार्तंडांना आवाहन होते.त्या काळात अहमदनगर येथे इंग्रज महिला मिस फॅरार हि गोऱ्यां लोकांच्या मुलींसाठी शाळा चालवित होती. तेथे जाऊन जोतिरावांनी शाळा कार्यप्रणालीचा अभ्यास केला आणि अशीच शाळा पुण्यात काढण्याचे ठरविले.
जोतिरावांनी पुण्यातील मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्या सहकार्याने गंज पेठेतील जागेत मुलीची शाळा ०१ जानेवारी १८४८ रोजी सुरू केली. हा दिवस भारतातील लोकांसाठी शिक्षणाचा क्रांतिकारी दिवस ठरला.या शाळेतील मुलींना शिक्षण शिकविण्याचा पहिला बहुमान सावित्रींना मिळाला. भारतीय स्त्रियांच्या समग्र क्रांतिपर्वाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चार ब्राह्मण, एक मराठा, एक धनगर अशा सहा मुलींनी शाळेत प्रवेश घेतला.
पुण्यात जोतिरावांनी मुलींची शाळा काढली असून त्या शाळेची शिक्षिका सावित्री आहे, हे समजताच सनातनी ब्राह्मणांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि पुण्यात ओरड सुरू केली की, धर्माप्रमाणे स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाही, स्त्रियांना शिकविणे अधर्म आहे. स्त्रीने शिक्षण शिकणे म्हणजे पाप आहे. जात बुडेल, धर्म बुडेल आणि पृथ्वीवर पाप वाढून एक दिवस ही पृथ्वी बुडून जाईल आणि देव सर्वमानव जातीचा संहार करतील, अशी दहशत ब्राह्मणांनी पुण्यात सुरू केली होती. एवढ्यावरच न थांबता सावित्री शाळेला जाताना दगड, शेण मारा करू लागले. जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यावेळी जोतिरावाचे व्यायाम शाळेतील गुरू लहुजी वस्ताद व राणबा महार सावित्रीबाईच्या मदतीला धावून आले. त्यांनी सावित्रीला सुरक्षित शाळेत नेण्याचे व आणण्याचे कार्य सुरू केले.एका वर्षात शाळेत २५ मुलींनी प्रवेश घेतला. त्यात ब्राह्मण – १०, मराठा-६, चांभार-२, महार-२, मांग-१, धनगर-१, कोष्टी-१, साळी१, माळी-१ अशा जातीच्या मुली शिक्षण घेत होत्या.
जोतिराव आणि सावित्री एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिक्षणाचे कार्य पुढे नेटाने सुरू ठेवले. हजारो वर्षांच्या अज्ञानात खितपत पडलेल्या समाजाला एक शाळा कशी पुरी होणार? त्यांनी एका पाठोपाठ एक अशा अठरा शाळा सुरू केल्या. मुलांसाठीही त्यांनी शाळा काढली. अवघ्या चार वर्षांत पुण्यात सात शाळा सुरू झाल्या. पहिली भिडे वाड्यात, दुसरी महारवाड्यात, तिसरी चिपळूणकर वाड्यात, चौथी नाना पेठेत, पाचवी रास्ता पेठेत, सहावी वेताळ पेठेत, सातवी कसबा पेठेत. तसेच पुण्याच्या बाहेर हडपसर, ओतूर, सासवड, शिरवळ, तळेगाव, शिरूर, अंजीरवाडी, करंजे, भिंगार, मुंढवे या ठिकाणी शाळा सुरू केल्या.सावित्रीने आपल्या माहेरी सातारा जिल्ह्यात नायगाव येथेही शाळा सुरू केली. आपल्या जन्मभूमीत अज्ञानरूपी अंधारात ज्ञानाचा दिवा लावून सावित्रीने माहेरचे ऋण फेडले.
शाळांचा विस्तार वाढत गेला तसा सावित्रीचा कामाचा व्यापही वाढला. त्या सुरुवातीला शिक्षिका होत्या. नंतर मुख्याध्यापिका झाल्या. जोतिबा सावित्रीने सुरू केलेले कार्य सनातनी ब्राह्मणांना पहावले नाही. एक शूद्र माळ्याची बाई स्वतः शिकते आणि इतरांना शिकवते हे त्यांच्या वृत्तीला परवडणारे नव्हते. म्हणून त्यांनी पुन्हा गोविंदरावांना धर्माचा आसरा घेऊन आपल्याच मुलाच्या विरोधात उभे केले.जोतिरावांना आपल्याच घरातून सन १८४९ साली बाहेर पडावे लागले. सावित्रीच्या सख्या भावानेही पत्र लिहून सावित्रीबाईंला शिक्षणाचे कार्य थांबविण्यास सांगितले. सावित्री आणि जोतिबांनी काम थांबवावे यासाठी चारही बाजूंनी प्रयत्न केले. पण निष्फळ ठरल्यावर ब्राह्मणांनी आडदांड माणसाला हाताशी धरून बेअब्रू करण्याची धमकी दिली. पण सावित्री डगमगल्या नाहीत.शाळेत जाण्याच्या रस्त्यावर लहान मुलांकडून कधी मोठ्या माणसांकडून सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकले जाई. दगड मारले जात. त्यावेळी त्या निमूटपणे पुढे जात. सावित्रीबाई शाळेत जाताना सोबत एक साडी घेऊन जात आणि शाळेत गेल्यावर शेणा-चिखलाने भरलेली साडी काढून दुसरी साडी नेसत. परंतु त्या आडदांड माणसाने अब्रूचा विषय काढताच त्या संतापल्या आणि पुढे होऊन त्या आडदांड माणसांच्या थोबाडात फाड फाड थापडा मारल्या. त्यामुळे त्या आडदांड माणसाची बोबडी वळली. एक खंबीर महिला म्हणून सावित्रीच्या नावाची सगळीकडे चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा कोणी सावित्रीला बोलण्याची हिंमत केली नाही.या सर्व संकटावर मात करून सावित्रीबाई खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रियांसाठी विद्येची देवता ठरल्या.
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य
या देशात दोन हजार वर्षांपासून ९७ टक्के लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. त्यांच्या स्त्रियांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.त्यांच्या कर्मठ धर्माच्या दृष्टीकोनातून स्त्री ही चुल आणि मूल यासाठी वापरण्याची वस्तू होती. तिला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. अशा काळात आणि पेशवाईच्या पुण्यात फुले दांपत्यांनी शिक्षणाचे कार्य सुरू केले. परंतु इतिहासकारांनी सावित्रीबाईची ओळख अशी करून दिली की, ती महात्मा फुले यांच्या पत्नी आणि मुलीच्या शाळेची शिक्षिका म्हणूनच. परंतु सावित्रीबाईची योग्यता ही त्याहीपेक्षा खूप मोठी होती.सावित्रीबाई शाळेत शिक्षिका म्हणूनच काम केले नाही, तर त्या आपल्या शैक्षणिक अनुभवावरून आणि निरीक्षणावरून अनेक शिक्षण शास्त्रविषयक निष्कर्ष काढून त्या अंमलात आणणाऱ्या शास्त्रज्ञ होत्या. मागासवर्गीय मुलांचा शैक्षणिक विकास करायचा असेल तर त्याच समाजातील शिक्षक पाहिजेत. म्हणून पुढे त्या पद्धतीने मागासवर्गातील शिक्षकास प्राधान्य दिले. कारण सावित्रीबाई आणि सहकारी फातिमा शेख यांचे शिकविणे उत्कृष्ट असूनही श्रीमंत व ब्राह्मण मुलीच्या शाळेची प्रगती अधिक आहे असे दिसून आले.तेव्हा सावित्रीबाईंनी असा सिद्धांत मांडला की, ज्या समाजातून व ज्या परिस्थितीतून मुली, मुले येतात, त्याचा बरा वाईट परिणाम संबंधित मुला-मुलीच्या शिक्षणावर होत असतो. कारण उच्च वर्णातील शिक्षक हे शूद्र जातीतील मुलांना जवळ करणार नाहीत. आणि उच्च जातीतील मुलानाच जवळ करीत असतील तर त्यांचा परिणाम समाजातील मुलाच्या मनाचे खच्चीकरण करणारे ठरेल. म्हणून ज्या समाजाची मुलं त्याच समाजाचा शिक्षक असणे गरजेचे असते, हा मानवशास्त्रीय सिद्धांत सावित्रीनी मांडला. इ. स. १८५३ मध्य सावित्रीबाईंनी मांडलेला सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे.
आपल्या शाळेत शिक्षिका प्रशिक्षितच असल्या पाहिजे म्हणून फुले दांपत्यांनी एक नॉर्मल स्कूल काढले. माणसाला नुसते शिक्षण देऊन चालणार नाही तर त्यासाठी शिक्षणाबरोबर संस्कार आणि संगत यांची जोड पाहिजे. तरच माणसाला माणूसपण येऊ शकते, असा शिक्षण सिद्धांत फुले दांपत्यांनी मांडला आणि अंमलात आणला. म्हणून त्यांना शिक्षणतज्ज्ञही म्हणतात.
जोती-सावित्रीनी स्त्री व शूद्रांसाठी चालविलेल्या शाळेची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होऊ लागली. १२ फेब्रुवारी १८५३ रोजी मुलांच्या शाळेची तपासणी झाली. पुणे महाविद्यालयातील सभामंडपात तीन हजार शिक्षणप्रेमी लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला ब्रिगेडियर ट्रायडेल व त्यांची पत्नी इ.सी. जोन्स, प्रोफेसर फ्रेजर, सरदार अण्णा साहेब ढमढेरे, प्रोफेसर छत्रे, प्रो. कृष्णशास्त्री चिपळूणकर, श्री. बापुराव भांडे आणि पुणे महाविद्यालयाचे प्रा. मेजर कँडी इत्यादी प्रतिष्ठित व विद्वान मंडळी या समारंभास हजर होती.२१ मार्च १८५३ रोजी जोतिरावांनी स्थापन केलेल्या अतिशूद्राच्या शाळेची वार्षीक परीक्षा शुक्रवार पेठेतील पेशव्यांच्या तालीमखान्यात झाली. या समारंभास न्यायमूर्ती कीझ हजर होते.जोतिरावांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत तीन मुलींच्या शाळा होत्या.या शाळेतील मुलींची पटसंख्या २३७ होती. या मुलीच्या शाळेसाठी १६ डिसेंबर १८५३ ला राज्यपाल ना. व्हायकाऊंट फॉकलंड यांच्याकडे जमीन मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार शाळेच्या संस्थेस भोकरवाडी येथील सहा एकर तेहतीस गुंठे जमीन सन १८५७ मध्ये देण्यात आली.
जोती-सावित्रीचे शैक्षणिक कार्य पाहून इंग्रजांना जाग आली आणि अस्पृश्यांच्या शिक्षणविषयक धोरणात बदल केला. सन १८५४ साली ईस्ट इंडिया कंपनीने वूड नामक खलिता प्रस्तुत केला. या खलित्यानुसार येथून पुढे जातीच्या कारणास्तव कोणत्याही मुलीला सरकारी शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश नाकारता येणार नाही, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे जोती-सावित्रीनी चालविलेल्या महार-मांगाच्या शैक्षणिक कार्यास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले.यावरच न थांबता जोती-सावित्रीनी शेतकरी आणि त्यांच्या बायकांसाठी प्रौढांची रात्रीची शाळा सुरू केली. या शाळेत जोतीराव व सावित्रीबाई . रोज रात्री दोन तास मोफत शिकवित असत. या जोडप्यांनी अंधश्रद्धेचा अज्ञान, अंधकार हा ज्ञानाचा दिवा लावूनच नष्ट केला. त्यामुळे त्या संपूर्ण भारतीय समाजाच्या राष्ट्रपिता व आणि राष्ट्रमाता ठरल्या.
सावित्रीबाई फुले यांचा सत्कार जोतीराव-सावित्रीमातेने सुरू केलेल्या शैक्षणिक कार्याची नोंद इंग्रज अधिकाऱ्यांनी घेतली होती. १६ नोव्हेंबर १८५२ साली पुण्यात विश्रामबागेजवळ फुले दांपत्याचा सत्कार करण्याचे ठरले होते. या सत्कार समारंभाला पुण्यातील विद्वान शास्त्री मंडळी, कलेक्टर, प्रोफेसर, ब्रिटिशांचे विविध खात्यातील अधिकारी या कार्यक्रमाला हजर झाले होते. मेजर कँडी यांच्या हस्ते सावित्रीमाता व जोतीरावांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभी कँडी साहेब म्हणाले, “मिशनरी पद्धतीने सावित्रीबाईंनी स्त्रियांची सेवा केली. विरोधकांचा विरोध सहन करून जिद्दीने कार्य चालू ठेवल्या. त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या कार्याला भारतीय इतिहासात तोड नाही. सावित्रीबाईंनी स्त्री-शूद्रांची सेवा ईश्वर सेवा मानून केली. स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुल्या करून दिल्या.” इंग्रज सरकारने हा वैभवशाली सत्कार घडवून आणला होता. अशाप्रकारे इंग्रज सरकारकडून सन्मान मिळविणाऱ्या भारतीय पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई ठरल्या. त्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीयांची विद्येची देवता म्हटले तर वावगे ठरणार नाही.
महिला सेवा मंडळाची स्थापना
सावित्रीबाईंनी जोतीरावांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री सुधारणासाठी एक “महिला सेवा मंडळ” संस्था स्थापन केली. ही भारतातील महिलाविषयक कार्य करणारी पहिली संस्था होती. या संस्थेच्या अध्यक्ष पुण्याचे कलेक्टर मि. जोन्स यांच्या पत्नी मिससे जोन्स होत्या. या संस्थेतर्फे पहिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम १४ जानेवारी १८५२ साली घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या पत्रिका पुढीलप्रमाणे काढून घरोघर पाठविण्यात आल्या, त्या पत्रिकेचा काही अंश असा : ‘ समारंभ सायंकाळी ५ वाजता आहे, कोणत्याही जातीच्या अथवा धर्माच्या बायका आल्या तरी त्या एकाच जाजमावर बसतील, जातीभेद व पक्षपात न करता सर्वाना सारखेच मानून हळदी कुंकू लावण्यात येईल आणि तिळगुळ वाटण्यात येईल.’ या वरून असे लक्षात येते की, जातिव्यवस्थेच्या भिंती पाडण्याचे कार्य या कार्यक्रमातून सावित्रीबाईंनी केले. या कार्यक्रमात गं. भा. सगुणाबाई क्षीरसागर, सौ. सरस्वतीबाई भ्र. सदाशिव, रा. ब. लोखंडे, सौ. अक्कासाहेब गणेश जोशी, सौ. उमाबाई भ्र. सिद्धेश्वर शास्त्री, सौ. हणमंतीबाई अय्यावारू, सौ. सावित्रीबाई भ्र. अण्णा रोडे, सौ. राधाबाई भ्र. नारायणराव लोखंडे यांनी मदत केली. यावरून या कार्यक्रमास सर्व जातिधर्माच्या स्त्रिया उपस्थित होत्या हे सिद्ध होते.
बालहत्या प्रतिबंधक गृह व विधवाश्रमाची स्थापना
एकदा सावित्रीबाई शाळेतून घरी येताना एक दृश्य दिसलं. एका कचरा कुंडीत टाकून दिलेल्या बाळाला कुत्रे फाडून खात होतं.हे दृश्य पाहून सावित्रीबाईचं हृदय हादरलं. त्यांना ते पाहवलं नाही. त्या घरी आल्यावर तो प्रसंग त्यांनी जोतीरावांना सांगितला. दोघानाही खूप दुःख झाले. २८ जानेवारी १८५३ रोजी “बालहत्या प्रतिबंधक गृह व विधवाश्रम” गृह सुरू केले.बाल हत्या करण्यापेक्षा आमच्या घरी ते मुल आणून द्या. आम्ही त्याला वाढवू असं सांगू लागले. समाजाकडून, नातलगाकडून फसवल्या गेलेल्या विधवा स्त्रियांनी आत्महत्या करू नये. त्यांनी आपलं माहेर समजून आमच्या घरात राहायला यावं. सुखरूप बाळांतपण करून घ्यावं. असा प्रचार सुरू केला. एवढ्यावरच न थांबता रात्रीला अशी घटना घडू नये म्हणून रात्री कंदील घेऊन गावात फिरू लागले. यावरून सावित्री राष्ट्रमाता आणि जोतीराव राष्ट्रपिता ठरले.जोतीराव आणि सावित्रीमाता शिक्षणाचे कार्य सुरू करून थांबल्या नाहीत तर त्यांनी समाजातील अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा दूर करण्यासाठी पर्यायही शोधत होते. समाजातील बालविधवा होणे, कुमारी माता होणे आणि आत्महत्या करणे ही स्थिती त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यासाठी “बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवाश्रमाची” निर्मिती केली होती. आणि तसा प्रचार करीत होते.
एकदा रात्रीच्या वेळी जोतीराव पुण्यातील लाकडी पुलावरून फिरायला जात असताना पुलाच्या कठड्यावरून नदीत कोणीतरी उडी घेण्याचा प्रयत्न करीत असलेले दिसले. त्यावेळी जोतीराव घाई घाईने त्या व्यक्तीस उडी मारण्यापासून रोखले व विचारपूस केली. ती एक विधवा स्त्री घरातील पुरुषाच्या वासनेची शिकार होऊन गरोदर होती आणि घरच्या जाचाला कंटाळून नदीत आत्महत्या करण्यासाठी आली होती. त्या विधवा स्त्रीची समजूत काढून तिला धीर दिला. ती स्त्री ब्राह्मण समाजातील बालविधवा काशीबाई होती. त्या काशीबाईला जोतीरावानी आपल्या घरी आणून सावित्रीच्या हवाली केले. सावित्रीबाईने काशीबाईची नीट काळजी घेऊन तिचे बाळांतपण केले आणि जन्मलेल्या बाळाची नाळ स्वतःच कापून १२ व्या दिवशी बारसे करून, त्या बाळाचे नाव यशवंत ठेवले.फुले दांपत्याला मुलबाळ नसल्यामुळे त्यांनी काशीबाईच्या यशवंताला दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनविले. ,
न्हाव्यांचा संप घडवला
पेशवाईच्या काळात पुण्यात भयानक परिस्थिती होती. वैदिक धर्माच्या मनुस्मृतिची तंतोतंत पालन केले जात होते. शूद्र माणूस रस्त्याने चालला की कमरेला झाडू आणि गळ्यात मडके बांधून जावे लागत असे. बालविवाह होत असत. आणि त्या स्त्रीचा नवरा मेला तर तिला सती देत. स्त्री विधवा झाली की तिच्या बांगड्या फोडीत, कुंकू पुसले जात, तिचे अंगावरील अलंकार काढून घेत, एवढ्यावरच न थांबता न्हाव्याला बोलावून त्याच्यापुढं बसवत व तिचे संपूर्ण केस काढून विद्रूप बनवित. मगच त्या नवऱ्याची अंत्ययात्रा काढीत. पुढचे जीवन त्या स्त्रीला पशूपेक्षा हलाकीचे जगावे लागत असे . हे कुठेतरी थांबलेच पाहिजे असे सावित्री बाईला आणि हे जोतीरावांना वाटत होते.त्यांनी सर्व न्हावी समाजाला एकत्र बोलविले.त्यांची सभा भरविली आणि त्या सभेत जोतीरावांनी केशवपनाबद्दल आपले विचार मांडले. सावित्रीबाई नामदेव न्हाव्याला उद्देशून म्हणाल्या, “सांगा बरं दादा, विधवाबाईचे केस कापण्याचा मोबदला तुम्हाला काय मिळतं?” नामदेव न्हावी म्हणाला, “त्या बदल्यात एक पैसा मिळतो.’ सावित्रीबाई सर्व न्हाव्यांना उद्देशून म्हणाल्या, “एका पैशासाठी तुम्ही किती वाईट काम करता याची तुम्हाला जाणीव आहे काय? आधीच बिचारीचा नवरा मेल्याचं दुःख भरपूर असत. त्यात तिच्या डोक्याला वस्तारा लावून चेहरा विद्रूप करता, त्या बिचारीला किती वाईट वाटत असेल याचा विचार केलाय का तुम्ही कधी? त्या विधवेच्या ठिकाणी तुमची भगिनी ठेवून बघा. या साऱ्या तुमच्याच भगिनी आहेत. भावानो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, हे काम तुम्ही बंद करा.”सावित्रीबाई फुले यांचे हे विचार सर्व न्हाव्यांना पटले. त्या काळात दिनबंधू वृत्तपत्राचे संपादक नारायण मेघाजी लोखंडे कामगार संघटना चालवित होते. त्यांनी सर्व नाभिकांना संघटित केले. सर्व न्हाव्यांनी विधवा स्त्रियाच्या केसाला वस्तारा न लावण्याची प्रतिज्ञा केली.अशा पद्धतीने न्हाव्यांचा संप घडवून आणण्यात सावित्रीबाई व जोतीराव यशस्वी झाले.
फुले यांनी वसतिगृह सुरू केले
जोतीराव आणि सावित्रीबाईनी शिक्षणाचे दारे खुली केली असली तरी गरिबी परिस्थितीमुळे शहरात येऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते. अशा गोरगरिब मुला-मुलींसाठी आपल्या घरातच वसतिगृह सुरू केले. त्यांच्या लागणाऱ्या खर्चासाठी जोतीरावांनी खिश्चन मिशनच्या शाळेत अर्धवेळ नोकरी स्वीकारली. सावित्रीबाई तर बिनपगारीच काम करत होत्या. आपलं पोट जिथं नीट भरत नाही त्या ठिकाणी दुसऱ्याचा विचार करणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. पहिल्यांदा दोनच मुले त्यांच्या वसतिगृहात राहू लागले. एक होता लक्ष्मण कराडी जाया मुंबईचा राहणारा आणि दुसरा होता महादू सहादू वाघोळे पुण्याजवळचा. हे दोघे दत्तकपुत्र यशवंत बरोबर मिळेल ती चटणी भाकरी खाऊन शिक्षण घेत होते.
अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला
सन १८५४ साली आऊ सगुणाबाईचे निधन झाले. सन १८६८ साली जोतीरावांचे वडील गोविंदराव फुले यांचेही निधन झाले. त्यामुळे जोतीरावांना आता स्वतःच्या घरी जावे लागले. सन १८६८ ला पाण्याचा दुष्काळ पडला होता. पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत होतं. सनातनी लोक नगरपालिकेच्या सार्वजनिक हौदाचे पाणी घेऊन जात होते. परंतु ज्या अस्पृश्यांना कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं घालून रस्त्याने जावे लागत होते,त्यांना पाणी कोण घेऊ देणार? बिचारे उन्हाळ्याच्या कडकडीत पाण्यासाठी रानोमाळ भटकत होते.कुणी नदीच्या पात्रात वाळूत खड्डे खोदीत होते आणि त्यातून घोटभर येणारे पाणी मडक्यात भरीत होते. कुठेच पाणी मिळत नसेल तर एखाद्या नाल्यातील घाणेरडे पाणी पिऊन तहान भागवत होते. हा प्रकार जोतीराव आणि सावित्रीबाईच्या नजरेतून सुटला नाही. त्यांनी अस्पृश्यांना पिण्यासाठी पाणी द्यावं म्हणून समाजापुढे प्रश्न मांडले; परंतु सनातनी लोक या गोष्टीला तयार झाले नाहीत. यावेळी जोतीराव एकेका अस्पृश्यांच्या हाताला धरून पाण्याच्या हौदाकडे आणायचे व त्या पाण्यात त्याच्याच हाताने मडके बुडवून पाणी देऊ लागले. त्यांनी सर्व अस्पृश्यांसाठी स्वतःच्या वाड्यातील पिण्याच्या पाण्याचे हौद खुले करून दिले. ही गोष्ट सनातनी ब्राह्मणांना समजली, त्यांनी खूप आगपाखड केली; परंतु फुले दांपत्य डगमगले नाहीत. हे जोडपे खऱ्या अर्थाने भारतीय शूद्राचे राष्ट्रपिता व राष्ट्रमाता ठरले.
विधवा विवाह महिला संघाची स्थापना
भारतात वैदिक धर्माप्रमाणे पुनर्विवाह पद्धती नव्हती. जर एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर त्या स्त्रीला सती जावे लागत असे किंवा जन्मभर पांढरे कपडे घालून विद्रूप शरीराने जगावे लागत असे. त्या स्त्रीला दुसरे लग्न करण्याचा अधिकार नव्हता. या विधवा स्त्रीला कोणत्याही शुभकार्यात सहभागी होता येत नव्हते. विधवा स्त्रीला अशुभ मानले जात होते. तिच्या दुःखाची जाणीव कुणालाच नव्हती, तिच्या मनाची कुणी विचारच करीत नसत. त्या स्त्रीला चार भींतीच्या आतच जीवन काढावं लागत असे. तिला पांढया पायाची म्हणून दोष देत असत. तरुण विधवांवर घरातल्या एखाद्या लंपट पुरुषानी बलात्कार केला तर निमूटपणे सहन करावे लागत असे. जर स्त्री गरोदर राहिली तर घराच्या जाचाला कंटाळून तिच्यापुढे आत्महत्याशिवाय पर्याय उरत नव्हता. असे प्रमाण सर्वात जास्त ब्राह्मण समाजातील स्त्रियांचेच घडत असत.अशा विधवांचे हे अंधारमय जीवन सावित्रीबाई जवळून पाहत होत्या. या विधवांना त्यांच्या अंधकारमय जीवनातून बाहेर काढण्याचा त्या विचार करू लागल्या. तरुणपणी विधवा झालेल्या स्त्रियांनी पुनर्विवाह करून सुखांचा संसार करावा असे सावित्रीमातेला वाटू लागले; परंतु या वाईट रूढी, परंपरा विरुद्ध लोकांना तयार करावे लागणार होते. ते करण्याचे धाडस सावित्रीबाईने जोतीरावांच्या सहकार्याने करून दाखविले.
जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी विधवा स्त्रियांसाठी “विधवा विवाह महिला संघ” स्थापन केला. भारतातील आधुनिक काळातील पहिलीच संघटना असावी. विधवांवर होणाऱ्या जुलूमाविरुद्ध जोतीराव आणि सावित्रीमातेने चळवळ सुरू केली. विधवांची जुलमी अत्याचारातून सुटका करण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे विधवा स्त्रीचा पुनर्विवाह करणे होय. या फुले दांपत्यांनी या चळवळीचे नेतृत्व केले आणि इ. स. १८६४ साली एका अठरा वर्षे वयाच्या विधवेचं लग्न एका शेणवी जातीच्या विधुराबरोबर लावून पुनर्विवाह करण्याची पद्धत सुरू केली.जर एखाद्या स्त्रीने पुनर्विवाह करीत नसेल तर तिने सन्मानाने जीवन जगण्यासाठी पती निधनानंतरही कुंकू लावावे, चांगले वस्त्र नेसावे आणि प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे विचार सावित्रीमाता मांडू लागल्या. सावित्रीमातेने एका ब्राह्मण विधवा स्त्री काशीबाईचे बाळांतपण केले. त्या मुलाचे बारशे केले आणि त्या बाळाला दत्तक घेतले. विधवा काशीबाईला कुंकू लावण्यास व चांगले कपडे वापरण्यास दिले. सावित्रीमाता ही सर्व भारतीय स्त्रियांची पहिली शिक्षिकाच नाहीतर राष्ट्रमाता ठरली.
धैर्यवान सावित्रीबाई फुले
महात्मा जोतीराव फुले अंथरुणात पडलेले होते. त्यांचा मुलगा यशवंत मोठा झाला होता आणि त्याचे शिक्षण चालू होते. परंतु महात्मा फुलेंना यशवंतच्या लग्नाची काळजी लागली होती. कारण तो एका ब्राह्मण विधवेचा मुलगा होता. त्याला कोण मुलगी देणार, ही चिंता लागून , राहिली होती. बऱ्याच खिश्चन मुली सांगून आल्या; परंतु यशवंताने त्यांना नकार दिला. सावित्रीमातेने आपल्या पाहुण्यातील मुलगी पाहिली आणि त्या मुलीला यशवंतने पसंत केले. ही मुलगी हडपसर येथील ग्यानबा कृष्णराव ससाणे यांच्या (माळी) कुटुंबातील होती.ही गोष्ट ( सनातन्यांच्या कानावर गेली आणि त्यांनी ससाणेच्या नातेवाईकांकडे तक्रार केली. त्यामुळे समाज या लग्नाला मान्यता देण्यास तयार होईना, ग्यानबा ससाणे हे महात्मा फुलेंना मानणारे होते. सावित्रीबाईने सर्व समाजाला समजावलं आणि ४ फेब्रुवारी १८८९ रोजी ग्यानबा ससाणेंची मुलगी राधा आणि यशवंतचे लग्न ‘सत्यशोधक पद्धतीने’ लावलं.सावित्रीबाईवर संकटावर संकटे आली तरी त्यांनी न घाबरता त्या सर्व संकटाला तोंड दिली. महात्मा जोतीरावांना पक्षाघाताचा झटका आलेला. त्या पाठोपाठ घरात कमावता कोणी नसल्यामुळे आर्थिक मंदी आली. समाजकार्यामध्ये तर वाढ झाली होती. ‘बालहत्या प्रतिबंधक गृह, शाळा, वसतिगृह,विधवाश्रम आणि सत्यशोधक समाज कार्यासाठी पैसा लागत होताच. या सर्व संकटावर मात करून कोंड्याचा मांडा खाऊन सावित्री मातेनं कार्यात कधीही खंड पडू दिला नाही. अशा परिस्थितीत महात्मा जोतीराव फुले २८ नोव्हेंबर १८९० साली जग सोडून गेले आणि सावित्रीबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
वैदिक (हिंदू) धर्मपद्धती प्रमाणे प्रेतयात्रेसमोर जो मडके धरतो तोच ) मृताचा वारसदार ठरतो. हे मडके धरण्याचा हक्क दत्तकपुत्र यशवंतच असताना त्याला विरोध करून पुतण्या मडकं धरण्यास पुढे आला आणि त्या दोघांत भांडणे लागली. त्या वेळेस सर्व दुःख आवरून सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या आणि स्वतः मडके हातात घेतले आणि स्वतःच्या हाताने पती महात्मा जोतीराव फुले यांना अग्नि दिला.
सावित्रीबाई जोतिबांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी ताठ मानेने कामाला लागल्या.. या पडत्या काळात मामा परमानंद आणि रामचंद्र धामणकर यांनी आर्थिक मदत करण्याचे काम सुरू ठेवले.या काळात १० फेब्रुवारी १८९२ साली सयाजीराव गायकवाड महाराजांकडून एक हजार रुपयांची मदत मिळाली. सावित्री सावित्रीबाईनी ही रक्कम तुकाराम तात्या पडवळ यांच्या कपनीत रामचंद्र धामणकरामार्फत गुंतविली. त्याचे व्याज तीन महिन्याला फक्त पन्नास रुपये मिळत. त्या पैशातूनच सावित्रीबाई आपला खर्च चालवायच्या.
सावित्रीबाई फुले यांचे शेवटचे दिवस
सावित्रीबाईचं वय झालेलं तरी पण त्यांचं सत्यशोधक चळवळीचं कार्य चालू होतं. त्या शरीराने थकलेल्या असल्या तरी मनाने थकलेल्या नव्हत्या. लोककल्याणासाठी, लोकांना जागृत करून त्यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करणार नाही तोपर्यंत समाजात परिवर्तन घडवून येणार नाही, हे सावित्रीमाता जाणत होती. म्हणून त्या कोणतेही संकट आले तरी त्या न डगमगता त्या संकटाला तोंड देत असत. हा क्रम त्याचा चालू असताना, निसर्गाचा कोप झाला.त्याकाळी विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती. भारतात तर शिक्षणाच्या अभावापायी दवाखानेही नव्हती. माणूस अज्ञान, अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरेत जगत होता आणि मरतही होता. याचाच परिणाम म्हणून नारू, देवी, कॉलरा, विषमज्वर, कावीळ, प्लेग यासारखे साथीचे रोग व्हायचे आणि अनेक लोक एका पाठोपाठ एक असे प्रत्येक घरातील चार पाच लोक मरायचे. हे रोग संसर्गजन्य असल्यामुळे रोगी माणसांची सेवा करण्यास निष्काळजीपणा झाला की तोही दगावयाचा. म्हणून त्या काळात जन्म मृत्युचे प्रमाण जवळ जवळ सारखेच असायचे.
सावित्रीबाई दुष्काळाचा सामना करून बाहेर पडतात न पडतात तोच दुसरा निसर्ग कोप सुरू झाला. सन १८९७ साली उंदरं पटापट मरू लागली आणि प्लेग नावाच्या साथीचा रोग सुरू झाला. पुण्यामध्ये प्लेगने थैमान घातले. पुणे परिसरात शेकडो माणसं मृत्युमुखी पडू लागली. या आकस्मिक प्रकारामुळे इंग्रज सरकारही गोंधळून गेले. हा रोग एकापासून दुसऱ्याकडे जातो. सुरुवातीला हा रोग हाँगकाँग बंदरापासून सुरू झाला.दळणवळणाच्या माध्यमातून हा रोग मुंबईला आला. तेथून हा प्लेगचा रोग पुण्यात आला होता.त्यामुळे इंग्रज सरकारने दळणवळणावर प्रथम बंदी घातली. रोग्याचा शोध घेण्यासाठी सैनिकांना पाचारण केले. इंग्रज सैनिक रोग्यांचा शोध घेत गावोगावी हिंडू लागले. ते सैनिक घर स्वच्छतेच्या नावाखाली लोकांना मानसिक त्रास देऊ लागले. शारीरिक छळ करू लागले. घरात रोगी दिसला की त्याला ओढतच घराबाहेर आणून रुग्णवाहिकेत टाकू लागले आणि जनावराप्रमाणे जंगलात, शिवारात फेकून देऊ लागले. त्यामुळे लोकांनी इंग्रज सैनिकांची धास्तीच घेतली होती.सावित्रीबाईनी “प्लेग निवारण महिला कमिटी”च्या मार्फत आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकांना मदत करण्यास सुरू केले. त्यावेळी सावित्रीबाईचा मुलगा यशवंत हा डॉक्टरची पदवी घेऊन अहमदनगर येथे नोकरी करत होता. त्याला पुणे येथे बोलावून घेतले आणि वानवडी येथे ससाण्याच्या माळावर आपला खाजगी दवाखाना उघडला. डॉ. यशवंतरावांनी आईने हाती घेतलेल्या मानवसेवेच्या कार्यास हातभार लावण्याचे कार्य सुरू केले. सत्यशोधक समाज संघटनेचे कार्यकर्ते आजारी माणसाला उचलून दवाखान्यात नेत होते. त्यावर डॉ. यशवंत उपचार करीत होते. या काळात सावित्रीबाई पायात भिंगरी बांधल्यासारख्या फिरत असत. या वयातही प्रचंड धावपळ करून लोकसेवा करीत होते.त्या मानव सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून मानव सेवेला वाहून घेतल्या होत्या.
सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू
पुण्याजवळ मुंढवे नावाचं खेडं होतं. तेथे मागासवर्गीयांची वस्ती होती. तेथे प्लेग रोगाने थैमान घातलेला होता.सावित्रीमातेला ही गोष्ट समजली. ताबडतोब त्या वस्तीत गेल्या. पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा मुलगा तापानं फणफणत होता. त्याला चालणंही शक्य नव्हत आणि वाहनही नव्हती. त्याच्यावर ताबडतोब इलाज करणे गरजेचे होते. त्योवळी सावित्रीमातेनं क्षणाचाही विलंब न करता वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्या मुलाला स्वतःच्या पाठीवर टाकून डॉ. यशवंतरावांच्या दवाखान्यात आणले. त्या मुलाची प्लेगची लागण सावित्रीमातेला झाली होती. त्याच्या काखेत भली मोठी गाठ आली. अंगात ताप वाढला. डॉक्टर मुलानी खूप प्रयत्न केले; परंतु ते प्रयत्न व्यर्थ गेले. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू १० मार्च १८९७ रोजी प्लेगच्या साथीने झाला.
मानवी मन असलेल्या मानवातील बावनकशी सोन म्हणजे सावित्रीबाई होत. सामाजिक कार्याची चळवळ तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या अलौकीक कार्य करणाऱ्या यशस्वी व्यक्तीच्या अर्धांगिनी होत्या. सावित्रीबाई स्वतंत्र व्यक्तिमत्व असणाऱ्यां कर्तृत्ववान कार्यकर्त्या आणि कृतीशील लेखिका व कवयित्री होत्या. आधुनिक कवयित्रींच्या परंपरेचा प्रारंभकाळ त्यांच्या पासून मानवा लागतो. सावित्रीबाई यांचे दोन कवितासंग्रह उपलब्ध आहेत. ‘ काव्यफुले’ हा कवितासंग्रह १८५४ मध्ये प्रसिद्ध झाला. दुसरा कवितासंग्रह ‘बावनकशी सुबोध – रत्नाकर’ हा १८९२ मध्ये प्रसिद्ध झाला. सावित्रीबाई यांची भाषणे व त्यांनी जोतीरावाना लिहिलेली पत्रे असे त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे.
सकल मानव जातीच्या कल्याणाचा ध्यास असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
सहाय्यक प्रा. कल्पना पाटील
मो. प. पाटील महाविद्यालय, बोरगाव
Comments
Post a Comment