Skip to main content

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोंबर 2023


आज वाचन प्रेरणा दिन !

१५ ऑक्टोंबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते.

आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन. आदरणीय कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.

पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आपण "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करीत आहोत. आपण शैक्षणिक जीवनात सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहूनही अंतिमत: अवांतर वाचनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे म्हटले जाते.

वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.

'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे.

वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.

हा संस्कार जितक्या लहान वयापासून केला जाईल तितके आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनत जाते. कारण या वाचनामुळे लहान मुलांमधील आकलन क्षमता वाढते. गोष्टींच्या पुस्तकातील कोणत्याही कथेला सुरवात, मध्य आणि शेवट असतोच. कथेच्या या रचनेमुळे लहान मुलांच्या मेंदूला चालना मिळते. ते विचार करायला सुरवात करतात, कारणांशी संबंध जोडतात, तार्किक विचार करीत मनातल्या मनात कथेचा शेवटही योजून ठेवतात.

एखादी गोष्ट अवगत करणे ही लहान मुलांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूची जडणघडण होते. वाचनाने विचार क्षमता वाढीस लागण्याचे हे मूळ कारण आहे. वाचन आपल्या मेंदूसाठी व्यायामाचे काम करते. विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात 'वाचन संस्कार' व्हावेत, यांच्या ठायी समृद्ध अशी अभिरुची, उच्च दर्जाची रसिकता आणि संवेदनशीलता हे मूल्य रूजविण्याच्या हेतूने या 'वाचन प्रेरणा दिनाचे' महत्व आणखीनच वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यां मध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले गेले पाहिजेत.

महत्वाचे म्हणजे वाचनाच्या वेगाची संकल्पना प्रत्येकाला असायली हवी. एका नजरेच्या टप्प्यात पुस्तकाचा जास्तीत जास्त भाग यायला हवा, तसा सरावही हवा. भारतीय लोकांचा सरासरी वाचनाचा वेग हा जपानी लोकांच्या सरासरी वाचनाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे हे खेदाने का होईना, आम्ही कबूल करतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त आकलनासह वाचन हे खरे वाचन कौशल्य.


या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य लक्षात घेवून आम्हाला आज वाचन या क्रियेसंदर्भात आणखी वेगळे काही सांगावयाचे आहे. 'वाचन' हा शब्द आला की, आपण फक्त 'पुस्तकी वाचन' एवढाच मर्यादित अर्थ घेतो. आमच्या मते वाचनाचा अर्थ इतका सिमित नाही. आपली पंचेद्रिये आणि मन ही खरी वाचनाची माध्यमे आहेत, त्यांचा वापर करता यायला हवा. डोळ्यांना जे जे दिसतं ते ते वाचता यायला हवं. मग वस्तु दिसो वा व्यक्ती किंवा घडणारा प्रसंग असो, डोळ्यांनी वाचायला हवं.

नाकाला जाणवणारा गंध वाचता यायला हवा!
कानांनी आवाज वाचता यावा असा सराव हवा!
त्वचेलाही होणारा प्रत्येक स्पर्श वाचता यायला हवा! 
स्पर्शवाचनातून स्पर्शाचा अर्थ कळायला हवा!
निदान वेळेवर सावध तरी होता येते!
जीभेलाही चव वाचता यायला हवी!
पंचेद्रियांच्या वाचनासाठी मनात संवेदना जागृत व्हायलाच हवी!

आणि सर्वांत महत्वाचे की, आपल्याला आपल्या मनाद्वारे दुसऱ्यांचे (किमान आपल्या घरातल्या व्यक्तींचे अथवा मित्रमैत्रीणींचे तरी) मन वाचता यायला हवे. दुसऱ्यांचे मन वाचता येणे हे उच्च कोटीच्या संवेदन शीलतेचे लक्षण आहे. अशा संवेदनशीलतेनेच मानवता जागृत होते हे ही लक्षात घ्यायलाच हवे. थोडक्यात काय, तर आपल्या सर्वच संवेदनांचे परिपूर्ण वाचन प्रत्येकाला करता येणे आवश्यकच आहे.

आता समारोप चारोळीने करुया !

*वाचाल तरच वाचाल !*

'वाचाल तर वाचाल !' हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन;
वाचाव्यात संवेदनाही, या जागृत पंचेद्रियांनी,
पुस्तकाच्या वाचनासवे, करावे मनाचे वाचन !

डॉ. रवींद्र आढाव सर.
ग्रंथपाल
********************************

Comments

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...