Skip to main content

श्रावण

सध्या श्रावण मास सुरु आहे. सर्वांचीच मने हर्षोउल्हासित करणारा हा महिना अनेक कवितांमधून, गीतांमधून अनेक कविंनी रंगवलेला आहे  . . .
          ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा
          पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा
हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक? लहानपणी ज्यानं हे पाऊसगाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. एक `पैसा’ हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ सोपं, की भर्रकन् पाठ व्हावं. एकही जोडशब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणच्या पावसाचं दुसरं एक गाणं…
         नाच रे मोरा,
         आंब्याच्या बनात,
         नाच रे मोरा नाच…
हे तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होतं. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातच.
भरपूर पाऊस यावा अन् शाळेला सुट्टी मिळावी. रेडिओ बहुदा बालगोपाळांच्या मनातली ही भावना नेमकी ओळखायचा. अगदी शाळेत जातानाच रेडिओवर....
          सांग सांग भोलानाथ,
          सांग सांग भोलानाथ,
          पाऊस पडेल काय
          शाळेभोवती तळे साचून,
          सुट्टी मिळेल काय ...
          हे गाणं लागायचं.
श्रावणात पडणाऱ्या पावसासाठी मराठी कवितेत `रिमझिम’ हा शब्द वापरला गेलाय. कित्येक मराठी गाण्यांतून ही 'रिमझिम’ झरताना दिसते. श्रावण महिना म्हटलं की यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरवळीवर खेळणारा बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी आठवतातच. नदीला पूर आल्यानंतर या कान्हाला शोधणारी यशोदा गाण्यातून दिसते.
          रिमझिम पाऊस पडे सारखा,
          यमुनेलाही पूर चढे,
          पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
          गेला मोहन कुणीकडे’
पूर्वी रेडिओवर हे गाणं हमखास लागायचं. गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही नावं या गाण्याला चिटकूनच यायची.
हिरवा श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस हा प्रेमीजनांना साद घालतो. अनामिक हुरहूर लावतो.
          झिमझिम झरती श्रावणधारा
          धरतीच्या कलशा
          प्रियाविण उदास वाटे रात
कवी मधुकर जोशींनी `रिमझिम’ या नेहमीच्या शब्दाऐवजी `झिमझिम’ असा शब्द वापरला आहे. तो वेगळाच नाद उत्पन्न करतो.
पाऊस आणि व्याकुळता हा संबंध फार प्राचीन काळापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्य़ाचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत सौभद्र नाटकासाठी लिहिलेलं हे गीत अजूनही लोकप्रिय आहे.
          नभ मेघांनीं आक्रमिलें,
          तारांगण सर्वहि झांकुनि गेले
          कड कड कड कड शब्द करोनी
          लखलखतां सौदामिनी
          जातातचि हे नेत्र दिपोनी
          अति विरही जन ते व्याकुळ झाले’
नवकवितेच्या आधुनिक काळातले कवी ग्रेस म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने समजून घ्यावेत. बाकी काही असो,
          पाऊस कधीचा पडतो,
          झाडांची हलती पाने
          हलकेच जाग मज आली,
          दुःखाच्या मंद सुराने
          पेटून कशी उजळेना,
          ही शुभ्र फुलांची ज्वाला
          ताऱ्यांच्या प्रहरापाशी,
          पाऊस असा कोसळला‘
                        किंवा
          ती गेली तेव्हा रिमझिम,
          पाऊस निनादत होता
          मेघांत अडकली किरणे
          हा सूर्य सोडवित होता
ही ग्रेसगाणी कोणालाही व्याकूळ करतात.

आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर जरा ओसरू लागलेला असतो. पण त्यानं निसर्गावर हिरवी पोपटी जादू केलेली असते. श्रावण महिना आणि बालकवींची कविता यांचं युगानुयुगांचं नातं जुळलेलं आहे.
          श्रावणमासी हर्ष मानसी
          हिरवळ दाटे चोहिकडे
          क्षणात येते सरसर शिरवे
          क्षणात फिरूनी ऊन पडे…
बालभारतीच्या पुस्तकात हे गाणं चिरंजीव झालं आहे. प्रत्येक पिढीचं हे गाणं तोंडपाठ आहे.
श्रावणाची आठवण निघालीय आणि कविवर्य भा. रा. तांबे आठवत नाहीत, असं होतच नाही. त्यांची
          पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
          ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर
          झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
          कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
          हिरवे हिरवे गार शेत हे सुदंर साळीचे
          झोके घेती कसे चहुकडे हिरवे गालिचे..’
ही कविता ओठ गुणगुणू लागतातच.
आभाळ भरून कोसळू लागलं की ग. दि. माडगूळकरांनी `वरदक्षिणा’ सिनेमासाठी लिहिलेलं गाणं मनात वाजू लागतं. 
          घन घन माला नभी दाटल्या,
          कोसळती धारा
          केकारव करी मोर काननी
          उभवून उंच पिसारा’
मल्हार रागात बांधलेलं हे गाणं ऐकूनच जणू मेघांमधला पाऊस धरतीवर बरसत असावा.यौवनसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या मुलीनं आधार घ्यावा तोपावसाचाच. 
आशा भोसलेंनी गायलेल्या
          आज कुणीतरी यावे,
          ओळखिचे व्हावे
          जशी अचानक या धरणीवर
          गर्जत आली वळवाची सर,
          तसे तयाने गावे
या गाण्यानं कित्येक नवपरिणीतांना हुरहूर लावली.
रानकवी ना. धों. महानोरांनी लिहिलेली पाऊसगाणी तर अजरामर झालीत.`जैत रे जैत’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं 
          नभं उतरू आलं,
          चिंब थरथर वलं,
          अंग झिम्माड झालं,
          हिरव्या बहरात’
परदेशस्थ मराठी माणसं हे गाणं आयपॉडवर ऐकत आपलं मराठीपण जागवत असतात. 
पावसाच्या सोबतीनं ताल धरणारी धम्माल कोळीगीतं तर इतर भाषिकांनाही ताल धरायला लावतायत. कवयित्री शांता शेळकेंनी लिहिलेलं 
          वादलवारं सुटलं गो,
          वाऱ्यानं तुफान उठलं गो
          भिरभिर वाऱ्यात,
          पावसाच्या माऱ्यात
          सजनानं होडीला पान्यात लोटलंय
          वादलवारं सुटलं गो…
हे गाणं अजूनही कोणालाही रोमांचीत करतं. शांताबाईंच्या सुंदर गीतांना सुधीर फडकेंनी अप्रतिम चाली लावल्या. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनीही नव्याकोऱ्या पध्दतीच्या संगीतरचना करून शांताबाईंची गाणी बसवली. त्यातलं श्रावण महिमा सांगणारं हे गाणं –
          ऋतु हिरवा, ऋतु बरवा,
          पाचूचा वनि रुजवा
          युग विरही हृदयांवर
          सरसरतो मधु शिरवा,
          ऋतु हिरवा’
शांता शेळकेंनी पावसावर प्रेमगीतं लिहिली, कोळीगीतं लिहिली, तशीच बालगीतंही लिहिली. असंच एक गोड गाणं त्या काळातल्या बालगायिका सुषमा श्रेष्ठ हिच्या आवाजात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलंय. 
          पाऊस आला, वारा आला,
          पान लागले नाचू
          थेंब टपोरे गोरे गोरे,
          भर भर गारा वेचू’
आपल्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी भुरळ घातली. नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची दृष्टीही दिली. त्याचं अरुण दातेंनी गायलेलं ,
          भेट तुझी माझी स्मरते
          अजून त्या दिसाची
          धुंद वादळाची होती
          रात्र पावसाची
हे गाणं पाऊस आला की अजूनही आपोआप ओठांवर येतं.  
मुंबईतल्या गर्दीत अन् लोकलच्या खडखडाटात कसला आलाय श्रावण, असं तुम्ही म्हणाल. पण पाडगावकर तुमची विकेट घेतील.
          श्रावणात घन निळा बरसला
          रिमझिम रेशिमधारा
          उलगडला झाडांतुन
          अवचित हिरवा मोरपिसारा ..
हे अतिव सुंदर गीत त्यांनी याच धावपळीत लोकलमध्ये जाता येता लिहिलंय.
कॉलेजवयात आरती प्रभूंचं आकर्षण वाटू लागलं ते त्यांच्या पाऊसगाण्यांमुळंच.  
          ये रे घना, ये रे घना,
          न्हाऊ घाल माझ्या मना’
पावसाचा अन् मनभावन श्रावणाचा हा गंध मनात असाच दरवळत राहावा. त्याच्या पोपटी कोवळ्या रुपाचा तजेला तनमनाला उल्हसित करीत राहावा. बस्स!
आणखी काय हवं?

(संग्रहातील)

Comments

Popular posts from this blog

महात्मा जोतिबा फुले: एक समाज सुधारक

महात्मा जोतिबा फुले, भारताच्या सामाजिक पुनरुत्थानातील एक अग्रणी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेले जोतिबा फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजातील अनेक कुप्रथांवर चाबूक चालवला. शिक्षण आणि सामाजिक जागृती: जोतिबा फुले यांनी लहानपणापासूनच समाजातील असमानता आणि अन्याय पाहिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि दलित समाजाचे उत्थान यासाठी अथक प्रयत्न केले. भारतातील पहिल्या कन्या शाळेची स्थापना त्यांच्याच प्रयत्नांमुळे शक्य झाली. सत्यशोधक समाज आणि त्यांचे विचार: जोतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाजातील अंधश्रद्धा आणि कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी लिहिलेले 'गुलामगिरी' हे पुस्तक ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेवर एक जोरदार प्रहार होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकास शिक्षण देण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. कार्याचा प्रभाव: जोतिबा फुले यांच्या कार्याचा भारतीय समाजावर दूरगामी परिणाम झाला. त्यांनी स्त्री शिक्षण, ...

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरीसारख्या अमर ग्रंथाचे रचयिता आणि भक्ति मार्गाचे प्रणेते, महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पूज्य आहेत. त्यांचे जीवन आणि कार्याने अनेकांना ज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले आहे. त्यांचा संजीवन समाधी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक असून, लाखो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला जमतात. संजीवन समाधी: एक अद्वितीय अवस्था संजीवन समाधी ही एक अशी आध्यात्मिक अवस्था आहे जिथे साधक शारीरिक रूपात असूनही, चैतन्यरूपात सतत उपस्थित राहतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच अवस्थेचा स्वीकार करून आपल्या भक्तांना सतत प्रेरणा देत राहिली. ही अवस्था केवळ ज्ञानेश्वर महाराजांपुरती मर्यादित नसून, भगवान बुद्ध, महावीर यांसारख्या अनेक संतांनीही या अवस्थेचा अनुभव घेतला आहे. आळंदी येथील उत्सव: एक सांस्कृतिक सोहळा आळंदी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात साजरा होणारा संजीवन समाधी सोहळा केवळ एक धार्मिक उत्सव नसून, एक सांस्कृतिक सोहळाही आहे. या सोहळ्यात भजन-कीर्तन, आरती, पहाटेचा पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम पार पाडले जातात. यासोबतच, वारकरी माऊलींच्या पायाला स्पर्श ...

रतन टाटा: एक भारतीय उद्योग जगतातील दिग्गज

भारतीय उद्योग जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, रतन टाटा यांचे निधन ही एक अतुलनीय क्षति आहे. त्यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व कौशल्यांनी आणि मानवतावादी दृष्टिकोनाने टाटा समूहाचे नाव जगभर प्रसिद्ध केले. टाटा समूहाचा उंचावटा: रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह एका बहुराष्ट्रीय समूहात रूपांतरित झाला. त्यांच्या काळात, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कंसल्टन्सी सर्विसेस (TCS) यांसारख्या कंपन्यांनी जगभरात आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूह हा केवळ एक उद्योग समूह नव्हता तर एक सामाजिक संस्था बनला. नवकल्पना आणि दूरदृष्टी: रतन टाटा हे एक प्रखर विचारवंत होते. त्यांच्या नवकल्पनांनी भारतीय उद्योगजगतात एक क्रांती घडवून आणली. टाटा नॅनोसारखी किफायतशीर कार बनवून त्यांनी भारतातील सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण केले. त्यांची दूरदृष्टी आणि नवकल्पना यांचे उदाहरण म्हणजे टाटा स्काय आणि टाटा टेलीसर्विसेस. समाजसेवा आणि मानवतावाद: रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नव्हते तर एक दयाळु माणूस होते. त्यांनी समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य आणि गरीबांच्या उत्था...