Skip to main content

श्रावण

सध्या श्रावण मास सुरु आहे. सर्वांचीच मने हर्षोउल्हासित करणारा हा महिना अनेक कवितांमधून, गीतांमधून अनेक कविंनी रंगवलेला आहे  . . .
          ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा
          पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा
हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक? लहानपणी ज्यानं हे पाऊसगाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. एक `पैसा’ हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ सोपं, की भर्रकन् पाठ व्हावं. एकही जोडशब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणच्या पावसाचं दुसरं एक गाणं…
         नाच रे मोरा,
         आंब्याच्या बनात,
         नाच रे मोरा नाच…
हे तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होतं. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातच.
भरपूर पाऊस यावा अन् शाळेला सुट्टी मिळावी. रेडिओ बहुदा बालगोपाळांच्या मनातली ही भावना नेमकी ओळखायचा. अगदी शाळेत जातानाच रेडिओवर....
          सांग सांग भोलानाथ,
          सांग सांग भोलानाथ,
          पाऊस पडेल काय
          शाळेभोवती तळे साचून,
          सुट्टी मिळेल काय ...
          हे गाणं लागायचं.
श्रावणात पडणाऱ्या पावसासाठी मराठी कवितेत `रिमझिम’ हा शब्द वापरला गेलाय. कित्येक मराठी गाण्यांतून ही 'रिमझिम’ झरताना दिसते. श्रावण महिना म्हटलं की यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरवळीवर खेळणारा बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी आठवतातच. नदीला पूर आल्यानंतर या कान्हाला शोधणारी यशोदा गाण्यातून दिसते.
          रिमझिम पाऊस पडे सारखा,
          यमुनेलाही पूर चढे,
          पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
          गेला मोहन कुणीकडे’
पूर्वी रेडिओवर हे गाणं हमखास लागायचं. गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही नावं या गाण्याला चिटकूनच यायची.
हिरवा श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस हा प्रेमीजनांना साद घालतो. अनामिक हुरहूर लावतो.
          झिमझिम झरती श्रावणधारा
          धरतीच्या कलशा
          प्रियाविण उदास वाटे रात
कवी मधुकर जोशींनी `रिमझिम’ या नेहमीच्या शब्दाऐवजी `झिमझिम’ असा शब्द वापरला आहे. तो वेगळाच नाद उत्पन्न करतो.
पाऊस आणि व्याकुळता हा संबंध फार प्राचीन काळापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्य़ाचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत सौभद्र नाटकासाठी लिहिलेलं हे गीत अजूनही लोकप्रिय आहे.
          नभ मेघांनीं आक्रमिलें,
          तारांगण सर्वहि झांकुनि गेले
          कड कड कड कड शब्द करोनी
          लखलखतां सौदामिनी
          जातातचि हे नेत्र दिपोनी
          अति विरही जन ते व्याकुळ झाले’
नवकवितेच्या आधुनिक काळातले कवी ग्रेस म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने समजून घ्यावेत. बाकी काही असो,
          पाऊस कधीचा पडतो,
          झाडांची हलती पाने
          हलकेच जाग मज आली,
          दुःखाच्या मंद सुराने
          पेटून कशी उजळेना,
          ही शुभ्र फुलांची ज्वाला
          ताऱ्यांच्या प्रहरापाशी,
          पाऊस असा कोसळला‘
                        किंवा
          ती गेली तेव्हा रिमझिम,
          पाऊस निनादत होता
          मेघांत अडकली किरणे
          हा सूर्य सोडवित होता
ही ग्रेसगाणी कोणालाही व्याकूळ करतात.

आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर जरा ओसरू लागलेला असतो. पण त्यानं निसर्गावर हिरवी पोपटी जादू केलेली असते. श्रावण महिना आणि बालकवींची कविता यांचं युगानुयुगांचं नातं जुळलेलं आहे.
          श्रावणमासी हर्ष मानसी
          हिरवळ दाटे चोहिकडे
          क्षणात येते सरसर शिरवे
          क्षणात फिरूनी ऊन पडे…
बालभारतीच्या पुस्तकात हे गाणं चिरंजीव झालं आहे. प्रत्येक पिढीचं हे गाणं तोंडपाठ आहे.
श्रावणाची आठवण निघालीय आणि कविवर्य भा. रा. तांबे आठवत नाहीत, असं होतच नाही. त्यांची
          पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
          ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर
          झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
          कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
          हिरवे हिरवे गार शेत हे सुदंर साळीचे
          झोके घेती कसे चहुकडे हिरवे गालिचे..’
ही कविता ओठ गुणगुणू लागतातच.
आभाळ भरून कोसळू लागलं की ग. दि. माडगूळकरांनी `वरदक्षिणा’ सिनेमासाठी लिहिलेलं गाणं मनात वाजू लागतं. 
          घन घन माला नभी दाटल्या,
          कोसळती धारा
          केकारव करी मोर काननी
          उभवून उंच पिसारा’
मल्हार रागात बांधलेलं हे गाणं ऐकूनच जणू मेघांमधला पाऊस धरतीवर बरसत असावा.यौवनसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या मुलीनं आधार घ्यावा तोपावसाचाच. 
आशा भोसलेंनी गायलेल्या
          आज कुणीतरी यावे,
          ओळखिचे व्हावे
          जशी अचानक या धरणीवर
          गर्जत आली वळवाची सर,
          तसे तयाने गावे
या गाण्यानं कित्येक नवपरिणीतांना हुरहूर लावली.
रानकवी ना. धों. महानोरांनी लिहिलेली पाऊसगाणी तर अजरामर झालीत.`जैत रे जैत’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं 
          नभं उतरू आलं,
          चिंब थरथर वलं,
          अंग झिम्माड झालं,
          हिरव्या बहरात’
परदेशस्थ मराठी माणसं हे गाणं आयपॉडवर ऐकत आपलं मराठीपण जागवत असतात. 
पावसाच्या सोबतीनं ताल धरणारी धम्माल कोळीगीतं तर इतर भाषिकांनाही ताल धरायला लावतायत. कवयित्री शांता शेळकेंनी लिहिलेलं 
          वादलवारं सुटलं गो,
          वाऱ्यानं तुफान उठलं गो
          भिरभिर वाऱ्यात,
          पावसाच्या माऱ्यात
          सजनानं होडीला पान्यात लोटलंय
          वादलवारं सुटलं गो…
हे गाणं अजूनही कोणालाही रोमांचीत करतं. शांताबाईंच्या सुंदर गीतांना सुधीर फडकेंनी अप्रतिम चाली लावल्या. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनीही नव्याकोऱ्या पध्दतीच्या संगीतरचना करून शांताबाईंची गाणी बसवली. त्यातलं श्रावण महिमा सांगणारं हे गाणं –
          ऋतु हिरवा, ऋतु बरवा,
          पाचूचा वनि रुजवा
          युग विरही हृदयांवर
          सरसरतो मधु शिरवा,
          ऋतु हिरवा’
शांता शेळकेंनी पावसावर प्रेमगीतं लिहिली, कोळीगीतं लिहिली, तशीच बालगीतंही लिहिली. असंच एक गोड गाणं त्या काळातल्या बालगायिका सुषमा श्रेष्ठ हिच्या आवाजात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलंय. 
          पाऊस आला, वारा आला,
          पान लागले नाचू
          थेंब टपोरे गोरे गोरे,
          भर भर गारा वेचू’
आपल्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी भुरळ घातली. नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची दृष्टीही दिली. त्याचं अरुण दातेंनी गायलेलं ,
          भेट तुझी माझी स्मरते
          अजून त्या दिसाची
          धुंद वादळाची होती
          रात्र पावसाची
हे गाणं पाऊस आला की अजूनही आपोआप ओठांवर येतं.  
मुंबईतल्या गर्दीत अन् लोकलच्या खडखडाटात कसला आलाय श्रावण, असं तुम्ही म्हणाल. पण पाडगावकर तुमची विकेट घेतील.
          श्रावणात घन निळा बरसला
          रिमझिम रेशिमधारा
          उलगडला झाडांतुन
          अवचित हिरवा मोरपिसारा ..
हे अतिव सुंदर गीत त्यांनी याच धावपळीत लोकलमध्ये जाता येता लिहिलंय.
कॉलेजवयात आरती प्रभूंचं आकर्षण वाटू लागलं ते त्यांच्या पाऊसगाण्यांमुळंच.  
          ये रे घना, ये रे घना,
          न्हाऊ घाल माझ्या मना’
पावसाचा अन् मनभावन श्रावणाचा हा गंध मनात असाच दरवळत राहावा. त्याच्या पोपटी कोवळ्या रुपाचा तजेला तनमनाला उल्हसित करीत राहावा. बस्स!
आणखी काय हवं?

(संग्रहातील)

Comments

Popular posts from this blog

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन - इंग्रजी विभागा मार्फत भित्तीपत्रकाचे उद्घाटन

23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइट दिवस म्हणून ओळखला जातो. 1995 या वर्षी पासून जागतिक पुस्तकदिन म्हणून साजरा केला जात आहे. दरवर्षी  भारतातही पुस्तकदिन साजरा केला जातो. लोकांना पुस्तके वाचण्यासाठी आणि प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी भारतातील अनेक भागांमध्ये त्यांचे स्मरण केले जाते. या वर्षीची थीम " तुमच्या मनाला जे आवडेल ते वाचा" आहे.मनाप्रमाणे वाचता आलं तरच मनाप्रमाणे सुंदर जगता येईल. ही थीम मुलांना त्यांच्या स्वतःच्या अटींवर वाचनाचा शोध घेण्यास प्रोत्साहित करते. वाचनाची आवड निर्माण करते आणि पुस्तकांच्या जगात त्यांची स्वतःची शैली आणि आनंद शोधण्यासाठी त्यांना सक्षम करते.   मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात इंग्रजी विभागा मार्फत जागतिक दिनानिमित्त विल्यम शेक्सपिअर ह्यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, त्यांना मिळालेले पुरस्कार, बक्षीस ह्यासंबंधीत माहिती देणारे भित्तीपत्रक प्रकाशित करण्यात आले. ह्या कार्यक्रमाचे स्वागत व  प्रास्ताविक बी. ए. भाग एक चा विद्यार्...

मोहनराव पतंगराव पाटील बोरगाव महाविद्यालयात स्त्री शिक्षणाचे प्रणेते - महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त अभिवादन.

 आज महाविद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. कुंडले होते त्यांनी आपल्या भाषणात  महाराष्ट्रात महात्मा जोतीराव फुले यांच्या विद्रोही विचारपरंपरेने व कर्तृत्वाने सामाजिक बदलाचा एक नवा प्रवाह घडला असे नमूद केले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. या कार्यक्रमात बी. ए. भाग तीन चे विद्यार्थी कु. मोनिका डांगे, कु. देवराज शेवाळे यांनी ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा पाटील होत्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रकाश बुरुटे यांनी केले.  महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त  त्यांच्या संबंधित माहिती असलेले e resources पुढील प्रमाणे आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. ज्योतिबा फुले Jyotiba Phule सावित्रीबाई फुले Savitribai Phule MARATHI, HINDI, ENGLISH BOOKS          📚 मराठी बुक्स 📚 1) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समग्र...

14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या पुस्तकप्रेमा बद्दल .....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकप्रेमाचा सर्वात मोठा दाखला म्हणजे लोकं स्वतःसाठी घर बांधतात पण त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं होतं. 1933 साली दादरच्या हिंदू कॉलनीत सुरेख अस दुमजली घर बांधले. राजगृह - या पुस्तकांच्या घराचं नाव त्यांनी एका विद्वानाच्या घराच्या नावावरून ठेवलं. हा विद्वान म्हणजे गौतमबुद्ध त्यांच्या राजेशाही घराच नाव राजगृह होते. त्यांच्या  या पुस्तकघरात आजही लाखांवरची पुस्तके आहेत. पण त्यांनी जेव्हा ही घर बांधल तेव्हा त्यात विविध विषयांवरची शेकडो पुस्तके होती. त्यामध्ये तत्त्वज्ञानाची 6000, अर्थशास्त्राची 1हजार, युद्धशास्त्राची 3 हजार, धर्मशास्त्राची 2हजार, कायद्याची 5 हजार पुस्तके  होती. आपल्या या पुस्तकांच्या घरात बाबासाहेब तासनतास ग्रंथ वाचत बसायचे त्यामुळेच बाबासाहेबांना प्रज्ञासुर्य असंही संबोधले जातं.  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकांसाठी खास  घर बांधणारी ही एकमेव व्यक्ती असून  त्यांना विनम्र अभिवादन! संदर्भ.... https://www.esakal.com/ampstories/web-story/dr-babasaheb-ambedkar-personal-library-house-rajgruh-collection-of-...